3802 hectares of crops damaged : अवकाळी पावसाचा बुलढाणा जिल्ह्यातील २०१ गावांमधील हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. ३ हजार ८०२ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे नुकसान झाले.

शरद माळोदे
बुलढाणा : जिल्ह्यात १८ व १९ मार्च २०२६ रोजी अवकाळी पावसाचा २०१ गावांमधील हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. ३ हजार ८०२ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक अंदाजाचा अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे.
वादळ, गारपीट आणि पावसाने रब्बीचे स्वप्न धुळीस मिळाले. गहू, हभरा, कांदा, कांदा बीज, मका, ज्वारी, भाजीपाला, डाळिंब, केळी, पपई, संत्रा, मोसंबी, आंबा, बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे.
बुलढाणा तालुक्यात १४ गावांमध्ये १४५ हेक्टरवरील कांदा, चिया, गहू पीक उद्ध्वस्त झाले. चिखली तालुक्यात १८ गावांमध्ये ७१२ हेक्टरवरील मका, ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला, डाळिंब, केळी, पपई, संत्रा, मोसंबी, आंबा पिकांची हानी झाली.
मोताळा तालुक्यात १६ गावांमध्ये १०२ हेक्टर, मलकापूर ४२ गावे ७४० हेक्टर, खामगाव २० गावे १४८ हेक्टर, शेगाव २ गावे ५ हेक्टर, नांदुरा १५ गावे २१० हेक्टर, जळगाव जामोद ४१ गावे ९५० हेक्टर, संग्रामपूर ११ गावे ७० हेक्टर, लोणार १० गावे १९० हेक्टर आणि देऊळगाव राजा तालुक्यातील १२ गावांमधील ५३० हेक्टर क्षेत्रावरील गहू, कांदा, मका, ज्वारी, केळी, चिया, हरभरा पिकांची मोठी नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


