Buldhana Crime News : दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. एकमेकांना विश्वास दिला. प्रियकराने उन्हाळ्यात लग्न करण्याचे आश्वासन दिले. भावी संस्कारिक आयुष्याची तिने स्वप्ने रंगविली. मात्र, मध्येच लग्नास नकार देऊन दगाबाज प्रियकराने साथ सोडली. यामुळे हताश झालेल्या तरुणीने आत्महत्या केली. चिखली तालुक्यातील केळवद येथे ही घटना घडली.
बुलढाणा : दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. एकमेकांना विश्वास दिला. प्रियकराने उन्हाळ्यात लग्न करण्याचे आश्वासन दिले. भावी संस्कारिक आयुष्याची तिने स्वप्ने रंगविली. मात्र, मध्येच लग्नास नकार देऊन दगाबाज प्रियकराने साथ सोडली. यामुळे हताश झालेल्या तरुणीने आत्महत्या केली. चिखली तालुक्यातील केळवद येथे ही घटना घडली.
रुपाली रामदास सरकटे (वय २०) असे मृत तरुणीचे नाव आहे. केळवदची रहिवासी असलेल्या रुपालीचे चिखली तालुक्यातीलच पाटोदा येथील तन्मय विजय गवई याच्यासोबत प्रेमसंबंध होते. आरोपीने रुपालीला ‘आपण उन्हाळ्यात लग्न करू’ असे आश्वासन दिले होते. या आश्वासनामुळे दोघेही सतत फोनवर संपर्कात असत आणि एकमेकांना भेटत. २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते १० च्या सुमारास आरोपी तन्मय याने रुपालीला फोन केला. त्याने थेट लग्न करण्यास नकार दिल्याने तिला धक्का बसला. यामुळे नैराश्यात जाऊन रुपालीने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी चिखली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली आणि अखेरच्या क्षणी नकार देऊन मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले. यावरून आरोपी तन्मय याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

