Mango orchard burnt to ashes : लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथील एक हेक्टर क्षेत्रावर लागवड केलेली आंब्याची बाग लागलेल्या आगीत जळून नष्ट झाली.

एक हेक्टर क्षेत्रावरील बागेची हानी : वडगाव तेजन येथील घटना
लोणार : एक हेक्टर क्षेत्रावर लागवड केलेली आंब्याची बाग लागलेल्या आगीत जळून नष्ट झाली. यामध्ये फळ पीक उत्पादक शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील वडगाव तेजन येथे ३० मार्च च्या सकाळी सहा वाजता त घटना घडली.
सत्यनारायण परमेश्वर तेजनकर यांना आगीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. कृषी विभागाअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून तीन वर्षांपूर्वी एक हेक्टर आंबा लागवड केली होती.
३० मार्चला सायंकाळी सहा वाजेदरम्यान शेताच्या शेजारी सदाशिव चौगुले यांच्या शेतातील गव्हाच्या काडाला आग लागल्याने अचानक सुटलेल्या वाऱ्याने आग पसरून तेजनकर यांच्या आंब्याच्या शेतात अंतर्गत गव्हाचे काड पेटले. त्यामुळे संपूर्ण बाग जळून खाक झाली. गावकऱ्यांनी आज विझविण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र यश आले नाही. झाडांसाठी फिनोलेक्स कंपनीचे लावलेले ड्रिचिंगसुद्धा आगीत जळून खाक झाले. स्प्रिंक्लर संचसुद्धा जळून खाक झाले.
रात्रंदिवस मेहनत करून ही बाग फुलविली होती. अवघ्या काही दिवसांवर या बागेचे आंब्याचे फळसुद्धा खायच्या अवस्थेत असताना बागेचे होत्याचे नव्हते झाल्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अतिवृष्टीनंतर आगीमुळे नुकसान
या आधी अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतकरी सतीश तेजनकर यांच्या आंबा बागेचे नुकसान झाले होते. परंतु त्यांनी परत जिद्दीने झालेले नुकसान भरून काढले होते. वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. प्रशासनाने ताबडतोब पंचनामा करून शेतकरी सतीश तेजनकर यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे.
मी तीन वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत एक हेक्टर आंबा फळबाग लागवड केलेली होती. मेहनतीने ही बाग फुलविली. यावर्षी या बागेतील आंब्याला चांगल्या प्रकारे फळे लागलेली असतानाच माझ्या शेजारील शेतकरी सदाशिव चौगुले यांनी त्यांच्या शेतातील गव्हाचे काड पेटविले. यात बाग जळून नष्ट झाली. माझे दहा ते पंधरा लाखांचे नुकसान झाले आहे. प्रशासन व शासनाने सदर बाबीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन शेतकऱ्यांना वाचविण्याचे दृष्टीने मदत करावी.
सत्यनारायण तेजनकर, शेतकरी


