Ramadan Eid Celebrated with Enthusiasm by the RPI (Athawale Faction): रिपाई आठवले गटाच्या वतीने रमजान ईद उत्साहात साजरी

बुलडाणा : शहरात रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर ईद-उल-फित्र (रमजान ईद) हा सण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने उत्साहपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पवित्र रमजाननंतर चंद्र दर्शन झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी जामा मस्जिदमध्ये सामुदायिक नमाज अदा केला.
या कार्यक्रमात रिपाई आठवले गटाचे प्रमुख नेते आणि आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक समाजभूषण ज्येष्ठ नेते प्रा. इंजि. भैयासाहेब पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव, जिल्हा अल्पसंख्याक आघाडी प्रमुख नबाब मिर्झा बेग, बुलडाणा तालुकाध्यक्ष केशवराव सरकटे, मोताळा तालुकाध्यक्ष बाळासाहेब आहीरे, चिखली तालुकाध्यक्ष हिम्मतराव जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना गळाभेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.

बुलडाणा नगरपालिकेचे नगरसेवक युनुस मेंबर, समाजसेवक उस्मान भैया यांच्यासह असंख्य मुस्लिम बांधवांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली. उपस्थित सर्वांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रा. इंजि. भैयासाहेब पाटील आणि पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जगाला युद्धाची गरज नाही तर तथागत बुद्धांच्या अहिंसा, शांती आणि ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वांची गरज आहे. महंमद पैगंबर यांनी दिलेला शांततेचा संदेश प्रत्येकाने आत्मसात केल्यास संपूर्ण जग सुखी व समाधानी राहील.
रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार डॉ. रामदासजी आठवले यांनीही समस्त मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी ईद सर्वांना सुख, शांती आणि भरभराटीची जावो, अशी मंगल कामना व्यक्त केली.


