Santosh Ugale, a farmer from Malkapur Pangra, sustained serious injuries after falling into a stream from a bridge. : मलकापूर पांग्रा येथील शेतकरी संतोष उगले पुलावरून ओढ्यात कोसळून गंभीर जखमी

अमोल साळवे
मलकापूर पांग्रा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) नियोजनशून्य आणि निष्काळजी कारभारामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड ते साखरखेडा राज्य महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. २१ तारखेला दुपारी ४ वाजेच्या सुमारास मलकापूर पांग्रा येथील पेट्रोल पंप समोरील पुलावर झालेल्या भीषण अपघातात संतोष केशव उगले (वय ४५) हे शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष उगले हे आपल्या दुचाकीवरून गावाकडे जात असताना, पुलावर माती साचल्यामुळे निर्माण झालेल्या आणि न दिसणाऱ्या धोकादायक गतिरोधकावरून त्यांची गाडी घसरली. नियंत्रण सुटल्याने गाडी थेट पुलावरून खालच्या ओढ्यात कोसळली. या अपघातात उगले यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
अपघातांची मालिका आणि प्रशासनाचे दुर्लक्ष
विशेष म्हणजे, याच मार्गावरील झोटिंगा फाटा पुलावर मागील महिन्यात किसन ढवळे व लीलावती ढवळे यांचा अपघात झाला होता. तसेच, जानेवारी महिन्यात भास्कर सांगळे आणि मंदा सांगळे हे देखील अशाच प्रकारच्या धोकादायक गतिरोधकामुळे गंभीर जखमी झाले होते. वारंवार अपघात होऊनही एमएसआरडीसी विभागाने या ठिकाणी साधे सूचना फलक, रिफ्लेक्टर किंवा प्रकाश व्यवस्था केलेली नाही.
ग्रामस्थांचे गंभीर आरोप
निकृष्ट काम: पुलाचे काम पूर्ण झाल्याचे भासवले जात असले तरी, सध्या केवळ माती टाकून ‘थातूरमातूर’ मलमपट्टी केली जात आहे.
साहित्याची अफरातफर: सार्वजनिक बांधकाम विभागाचे जुने, सुस्थितीत असलेले सिमेंट पाईप गायब झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
गरज नसताना तोडफोड: जुने पूल सुस्थितीत असतानाही ते पाडून नवीन पूल बांधण्याचा घाट का घातला, असा सवालही उपस्थित होत आहे.
प्रशासनाविरोधात संताप
पुलावर साचलेली दगड-माती आणि अनधिकृत गतिरोधक वाहनधारकांसाठी ‘डेथ ट्रॅप’ ठरत आहेत. जर प्रशासनाने तातडीने सुरक्षित उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या निष्काळजीपणामुळे परिसरात एमएसआरडीसी विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.


