Sharda Music Academy’s Silver Jubilee Celebration Concludes with Great Enthusiasm : शारदा संगीत विद्यालयाचा रजत महोत्सवी सोहळा उत्साहात संपन्न

बुलढाणा : स्थानिक शारदा संगीत विद्यालयाच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रजत महोत्सवी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यालयाचे संचालक श्रीकृष्ण तायडे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष टी. डी. अंभोरे पाटील होते, तर उद्घाटक म्हणून नेत्रतज्ज्ञ ह.भ.प. डॉ. विकास बाहेकर यांची उपस्थिती लाभली. प्रमुख अतिथी म्हणून काशिनाथ तायडे (केंद्र संचालक, महिला संगीत विद्यालय, बुलढाणा) आणि नंदकिशोर पाटील (अध्यक्ष, आदित्य अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी) उपस्थित होते.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला टच करा https://mahadesha.com/
उद्घाटनपर भाषणात डॉ. विकास बाहेकर यांनी संगीत साधना व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारी असून जीवनात आनंद आणि समाधान देणारी असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात टी. डी. अंभोरे यांनी “तानसेनइतकेच कानसेनही भाग्यवान असतात” असे म्हणत रसिकतेचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रास्ताविकात प्रा. डॉ. जे. एस. वाघमारे यांनी विद्यालयाच्या २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत, बुलढाण्यातील पवार गुरुजी, मोहिते गुरुजी आणि टाकळकर गुरुजी यांच्या संगीत परंपरेचा वारसा शारदा संगीत विद्यालय पुढे नेत असल्याचे नमूद केले.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर कलावंतांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये गायक रामेश्वर इंगळे, शाहीर निवृत्ती घोंगटे, साहित्यिक मधुसूदन भिसे आणि कथाकार-गीतकार अ. सा. नरवाडे यांचा समावेश होता. तसेच अ.भा. गांधर्व महाविद्यालयाच्या नोव्हेंबर-डिसेंबर परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र देवकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी मानले. उद्घाटनानंतर आकाशवाणी व दूरदर्शन मान्यता प्राप्त कलावंत दिगंबर अंभोरे (गजरखेडकर) यांचा सुगम संगीत कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमात आत्माराम दुतोंडे आणि कैलास कोल्हे यांनी सुमधुर गायन सादर केले. तबल्याची साथ दत्ता बाहेकर, राम जाधव आणि अमित पाटील यांनी दिली.
रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. कविमंडन, ॲड. जयंत जोशी, गजानन मोरे, रवींद्र लहाने, गणेश इंगळे, ए. बी. नाईक, धनंजय मऱ्हे तसेच विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


