Ten Gram Panchayats have the right to a building : दहा ग्रामपंचायतींना हक्काची इमारत आमदार श्वेताताई महालेंच्या प्रयत्नांतून मिळणार स्वतंत्र कार्यालय.

चिखली : विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत महायुती सरकारने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत १० ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र कार्यालय बांधकामासाठी निधीस मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रशासन अधिक सक्षम व लोकाभिमुख होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायतींकडे स्वत:ची प्रशासकीय इमारत नसल्यामुळे कामकाजात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. शासन निर्णयाद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींना निधी मंजूर करण्यात आला आहे.
बुलढाणा तालुक्यातील ग्रामपंचायत सातगाव म्हसला (निधी २५ लाख), कुलमखेड (२० लाख), पांग्री (२५ लाख), केसापूर (२० लाख)े, भडगाव (२५ लाख), डोमरूळ (२५ लाख), चिखली तालुक्यातील ग्रामपंचायत किन्ही सवडत (२० लाख), धोत्रा भनगोजी (२५ लाख), पळसखेड दौलत (२० लाख), बोरगाव वसू (२० लाख) या ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत मिळणार आहे.
या निधीमुळे ग्रामपंचायतींना आधुनिक व स्वतंत्र कार्यालयीन इमारती उभारता येणार आहेत. ग्रामस्थांना शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. या मंजुरीबद्दल आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले.
ग्रामीण विकासाला गती देणे आणि गावपातळीवरील प्रशासन मजबूत करणे हेच सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या निर्णयामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

डॉ. राजेश्वर उबरहंडे यांनी मानले ताईंचे आभार
पांग्री ग्रामपंचायत कार्यालयासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. राजेश्वर उबरहंडे यांनी आमदार श्वेताताई महाले यांचे आभार मानले.

