The fight against sand mafia is on the road; Villagers block Mumbai-Nagpur highway : राहेरी व परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करीत प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले. तब्बल दोन ते तीन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

दोन तास वाहतूक खोळंबली : गावकऱ्यांचे आक्रमक रूप पाहताच दोन बोटी, दोन पोकलेन जप्त
सिंदखेड राजा : तालुक्यातील राहेरी परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उपशामुळे पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात अखेर ग्रामस्थांचा उद्रेक झाला. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर रेती उपशाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केल्याने संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी थेट मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करीत प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले. तब्बल दोन ते तीन तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
राहेरी परिसरातील नदीपात्रात शासनाने केवळ ३४६३ ब्रास रेती घाटाची मर्यादित परवानगी दिली असताना संबंधित ठेकेदाराने नियम धाब्यावर बसवत बोटी व पोकलेनच्या साह्याने सर्रास अवैध रेती उपसा सुरू केला होता. शेकडो टिपरद्वारे रेतीची वाहतूक होत असून नदीकाठाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नदीपात्र खोल गेल्याने पर्यावरणीय समतोल धोक्यात आला आहे. भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली होती.
या आंदोलनात माजी साखर आयुक्त श्रीकांत देशमुख, अल्पसंख्याक सरचिटणीस राकॉं (अप) गट, माजी सभापती विलासराव देशमुख, शिवसेना नेते गजानन देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष आनंद देशमुख, लोकजागर परिवाराचे प्रवीण गीते यांच्यासह दत्तात्रय देशमुख, सुभाष देशमुख, बालाजी देशमुख, संजय देशमुख, बालासाहेब देशमुख, शिवाजी देशमुख, तात्यासाहेब डोंगरदिवे, धनंजय देशमुख, अशोक देशमुख, बालासाहेब गवई, मदन देशमुख, विनायक देशमुख, संजय रगड, अनिल देशमुख, गणेश मगर, मधुकर मगर, रमेश वरांडे, शेख जाकीर आदींसह राहेरी, दुसर बीड परिसरातील असंख्य ग्रामस्थ सहभागी झाले होते.
कारवाई होत नसल्याने जनता आक्रमक
या गंभीर प्रकाराबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. ७ फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजल्यापासून शेकडो ग्रामस्थांनी मुंबई-नागपूर महामार्गावर ठिय्या मांडत दुपारी बारा वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

प्रशासनास विचारला जाब
आंदोलनाची माहिती मिळताच तहसीलदार अजित दिवटे व ठाणेदार संजय मातोंडकर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. आंदोलनाचा वाढता रोष पाहता परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावेळी ग्रामस्थांनी अवैध रेती उपशामुळे होणाऱ्या पर्यावरणीय व सामाजिक नुकसानीचा जाब तहसीलदारांना विचारत संताप व्यक्त केला. त्यानंतर तहसीलदार अजित दिवटे यांनी तात्काळ रेती घाटाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीअंती अवैध रेती घाट तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून रेती उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन बोटी व दोन पोकलेन जप्त करण्यात आल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
… तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठाणेदार संजय मातोंडकर यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, प्रशासनाने वेळीच ठोस कारवाई केल्याने अनर्थ टळला. अवैध रेतीमाफियांवर कायमस्वरूपी कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.



