Safeguarding the health of lakhs of Warkaris through the ‘Charanseva’ initiative. : चरणसेवा उपक्रमातून लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची जपणूक: लोकसहभागातून साकारलेला आरोग्य महायज्ञ

मुंबई, दि. २३: आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग. लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे पायी चालत जातात. हा प्रवास केवळ भक्तीचा नसतो, तर तो शारीरिक आणि मानसिक कसोटीचाही असतो. याच कसोटीवर वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला ‘चरणसेवा’ उपक्रम शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी समारोपाला येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून लोकसहभागातून एका आरोग्य महायज्ञाचे रूप धारण केले आहे. यंदाच्या आषाढी वारीत तब्बल १४ जिल्ह्यांतील ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांनी या चरणसेवा आणि आरोग्यसेवेचा थेट लाभ घेतला आहे.

वारीतील आव्हानांवर मात करण्यासाठी ‘चरणसेवा’
आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना अनेक शारीरिक आव्हानांना सामोरे जावे लागते. सततच्या चालण्यामुळे येणारा शारीरिक ताण, स्नायूदुखी, पायांना येणारे फोड, थकवा आणि पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांचा धोका हे सर्व लक्षात घेऊन ‘चरणसेवा’ उपक्रम राबविण्यात आला. मागील वर्षी सात जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाचा यंदा विस्तार करण्यात आला असून, दिंडी मार्गावरील १४ जिल्ह्यांमध्ये तो यशस्वीपणे राबविण्यात आला.
चौदा जिल्ह्यांमध्ये आरोग्यसेवेचा विस्तार
सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, सांगली, अमरावती आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये १४० मुक्कामस्थळांवर सेवा केंद्रे उभारण्यात आली होती. या केंद्रांमधून वारकऱ्यांना केवळ चरणसेवाच नव्हे, तर मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी, प्रथमोपचार, आवश्यक औषधांचे वितरण, रुग्णवाहिका सुविधा आणि गरजेनुसार पुढील उपचारांची व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली. ही सेवा म्हणजे वारकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरली.
लोकसहभागातून साकारलेला आरोग्य महायज्ञ
या उपक्रमात १६४ आरोग्य संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. ७ हजार ५३८ स्वयंसेवक, ११ हजार ३३१ डॉक्टर, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवाकार्यात योगदान दिले. सेवेसाठी १० हजार टी-शर्ट आणि ३ हजार लिटर आयुर्वेदिक औषधी तेलाचा उपयोग चरणसेवेसाठी करण्यात आला. तसेच, ८ रथांद्वारे आरोग्य जनजागृती करण्यात आली. लोकसहभागातून साकारण्यात आलेल्या या उपक्रमामुळे तब्बल ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांना प्रत्यक्ष चरणसेवा आणि आरोग्यसेवा उपलब्ध झाली, हे या उपक्रमाचे सर्वात मोठे यश आहे.
उपचारांसोबतच आरोग्य जनजागृती
‘चरणसेवा’ उपक्रमाने केवळ उपचारांवर लक्ष केंद्रित केले नाही, तर आरोग्य जनजागृतीलाही विशेष महत्त्व दिले. आरोग्य जनजागृती रथांद्वारे स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, संसर्गजन्य आजारांपासून बचाव, रक्तदान, अवयवदान संदर्भात जनजागृती, निरोगी जीवनशैली तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. यामुळे वारकऱ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली.
यशाचे गमक: लोकसहभाग आणि सामूहिक प्रयत्न
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी या उपक्रमाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये ४ लाख ९६ हजारांपेक्षा अधिक वारकऱ्यांपर्यंत ‘चरणसेवा’ पोहोचविता आली, याचा आनंद आहे. या उपक्रमाच्या यशामागे लोकसहभाग हीच सर्वात मोठी ताकद ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला विविध आरोग्य संस्था, दानशूर व्यक्ती, डॉक्टर, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी आणि हजारो स्वयंसेवकांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे हे सेवाकार्य यशस्वी झाले.”
‘चरणसेवा’ उपक्रमाने केवळ वारकऱ्यांच्या पायांनाच नव्हे, तर त्यांच्या मनालाही स्पर्श केला आहे. लोकसहभागातून साकारलेला हा आरोग्य महायज्ञ महाराष्ट्राच्या सेवाभावी परंपरेचे एक उज्ज्वल उदाहरण ठरला आहे.


