Lower sugar prices, raise liquor prices. : साखरेचे भाव कमी करा, दारूचे दर वाढवा: माजी मंत्री सुबोध सावजी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
डोणगाव: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरात झालेली प्रचंड वाढ सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटवर मोठा परिणाम करत आहे. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर, माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक महत्त्वपूर्ण पत्र पाठवून साखरेसह खाद्यतेल आणि कडधान्यांचे भाव निम्म्यावर आणण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर, दारूचे दर दहा पटीने वाढवून राज्याचा महसूल वाढवावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. २२ ऑगस्ट रोजी पाठवलेल्या या पत्राने राज्यभर चर्चेला तोंड फोडले आहे.
हिंदू धर्मात सण-उत्सवांमध्ये गोडधोड पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. मात्र, साखरेच्या वाढलेल्या किमतींमुळे महिलांना हे पदार्थ बनवणे कठीण झाले आहे. सावजी यांनी आपल्या पत्रात ‘माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली असली तरी, साखरेच्या महागाईमुळे या बहिणींचा अपमानच होत असल्याचे नमूद केले आहे. कौटुंबिक वापरासाठी आवश्यक असलेल्या साखर, खाद्यतेल आणि कडधान्यांचे भाव अर्ध्यावर आणल्यास सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत आणि तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या गर्तेत ढकलली जात आहे. या गंभीर सामाजिक समस्येवर उपाय म्हणून, सावजी यांनी दारूचे दर दहा पटीने वाढवण्याची शिफारस केली आहे. त्यांच्या मते, साखरेचे दर कमी केल्यामुळे सरकारला होणारा महसुली तोटा दारूवरील वाढीव करातून भरून काढता येईल.
या उपाययोजनांमुळे राज्यातील जनता सुजलाम-सुफलाम होईल, असा विश्वास सुबोध सावजी यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. साखरेच्या किमती कमी करून दारूवर कठोर निर्बंध लादल्यास सामाजिक आणि आर्थिक अशा दोन्ही स्तरांवर सकारात्मक बदल घडून येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.


