mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

आता सरकारी कार्यालयाच्या कामकाजावर जनता देणार अभिप्राय : Now the public will be able to give feedback on the functioning of government offices

शेअर करा :

Now the public will be able to give feedback on the functioning of government offices : शासकीय कार्यालयातील कामकाज, कर्मचाऱ्यांची वागणूक, स्वच्छता व इतर मुद्यांवर कामानिमित्त येणारे नागरिक आपल्याला आलेले चांगले-वाईट अनुभव सरकारकडे अभिप्रायातून मांडू शकणार आहेत.

Now the public will be able to give feedback on the functioning of government offices

प्रत्येक कार्यालयात लावणार अभिप्राय पेटी

आसिफ शाह
मेहकर : शासकीय कार्यालयातील कामकाज, कर्मचाऱ्यांची वागणूक, स्वच्छता व इतर मुद्यांवर कामानिमित्त येणारे नागरिक आपल्याला आलेले चांगले-वाईट अनुभव सरकारकडे अभिप्रायातून मांडू शकणार आहेत. त्यासाठी प्रत्येक कार्यालयात अभिप्राय पेटी लावली जाणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला.
सरकारी कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांना अनेकदा चांगले अनुभव येत नाहीत. अधिकारी, कर्मचारी बराच वेळ जागेवर नसणे, योग्य उत्तरे न मिळणे, आवश्यक कागदपत्रांसाठीचा विलंब, उडवाउडवीची उत्तरे देणे, कार्यालयातील अस्वच्छता, बसण्यासाठी जागा, पिण्याचे पाणी नसणे, असे अनेक अनुभव नागरिकांना येतात.
कार्यालयांमध्ये काही वर्षांपासून सूचना पेटी किंवा तक्रार पेटी ठेवण्याची पद्धत अस्तित्वात आहे. पण त्याकडे कुणाचेही लक्ष नसते. आता राज्य सरकारने त्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याचा निर्णय घेत नागरिकांसाठी अभिप्राय पेटी ठेवण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. पूर्वी तक्रार किंवा सुचना पेटीचे स्वरूप तक्रारीपुरते मर्यादित होते. त्याचा प्रशासकीय सुधारणांच्या दृष्टिकोनातून पुर्ननिरीक्षण व पुनरावलोकन करण्याच्या व कार्यालयाच्या कामकाजाबाबत सुधारणेसाठी योग्य तो उपयोग होत नाही.

सुधारणेसाठी निर्णय
शासनाचे विविध विभाग व शासकीय कार्यालयांमार्फत नागरिकांना अनेक सेवा पुरविल्या जातात. या प्रक्रियेमध्ये नागरिकांना येणाऱ्या अडचणी, मिळणारी मदत, कार्यालयीन वातावरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांची वर्तणूक, कामकाजातील सुलभता किंवा विलंब याबाबतचा त्यांचा अनुभव प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने अभिप्रायाचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांच्या अनुभवांच्या आधारे शासकीय कामकाजाचे परीक्षण झाल्यास प्रशासनाला आत्मपरीक्षणाची संधी मिळून सुधारणा करणे सोयीचे होईल, हा उद्देश यामागे आहे.

पाच मुद्यांचा फॉर्म देणार


राज्यातील सर्व शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालयांमध्ये प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता व सुशासन या संकल्पनेच्या अनुषंगाने नागरिकांकडून त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे अभिप्राय प्राप्त करून घेण्यात येणार आहेत. त्यानुसार प्रत्येक कार्यालयामध्ये पाच मुद्यांचा समावेश असलेला फॉर्म उपलब्ध करून दिला जाणार आहे. हे अभिप्राय फॉर्म अभिप्राय पेटीजवळच उपलब्ध असतील. स्वत: कागदावर लिहून काही अभिप्राय द्यावयाचे असल्यास त्यांना फॉर्मचे बंधन नसेल. शासकीय कार्यालयास भेट देणाऱ्या नागरिकांना हा अभिप्राय सादर करण्यासाठी कार्यालयाच्या दर्शनी ठिकाणी कुलूपबंद अभिप्राय पेटी ठेवण्यात येणार आहे.

अनुभव गुणांकनस्वरूपात

अभिप्राय फॉर्ममध्ये नागरिकांना कार्यालयीन स्वच्छता, सेवा देण्याची पद्धत, नागरिकांशी वागणूक, कामकाजातील सुलभता या मुद्यांवर १ ते ५ इतके गुणांकन करता येईल. तसेच त्यांना आलेल्या अनुभवांवर मुक्त स्वरूपात त्यांचे अभिप्राय नोंदवून सदर अभिप्राय कुलूपबंद पेटीमध्ये टाकता येतील. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांबरोबरच अधिकारी व कर्मचारीसुद्धा शासन अधिकाधिक लोकाभिमुख कसे होऊ शकेल तसेच विकासात्मक व प्रशासकीय दृष्टीने शासकीय योजनांमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत, याबाबत आपले अभिप्राय नागरिक देऊ शकतील. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top