Water supply engineer and employee beaten up : रिसोड येथे पाणीपुरवठा विभागातील अभियंता व कर्मचाऱ्यास १७ फेब्रुवारीला दुपारी बाराच्या सुमारास मारहाण झाली. या घटनेचा तीव्र निषेध करीत कर्मचाऱ्यांनी १८ फेब्रुवारी रोजी काम बंद आंदोलन सुरू केले.

कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; विविध कामे खोळंबली
रिसोड : शहरातील अहेबाबनगर येथे नळपट्टी वसुलीसाठी गेलेल्या नगर परिषद पाणीपुरवठा विभागातील अभियंता व कर्मचाऱ्यास १७ फेब्रुवारीला दुपारी बाराच्या सुमारास मारहाण झाली. या घटनेचा तीव्र निषेध करीत कर्मचाऱ्यांनी १८ फेब्रुवारी रोजी काम बंद आंदोलन सुरू केले. दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी रेटून धरण्यात आली.
कामबंद आंदोलनामुळे नगर परिषदमधील विविध भागातील कामकाज खोळंबले. एकजुटीचे दर्शन घडवित कर्मचाऱ्यांनी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला.
कर्मचाऱ्यांनी नगर परिषद प्रवेशद्वारासमोरच ठाण मांडले होते. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
पाणीपुरवठा अभियंता डाखोरे व कर्मचारी अमजद खान हे नळपट्टी वसुलीसंदर्भात गेले असता सदानंद गायकवाड व त्याच्या परिवारातील दोन जणांनी त्यांना मारहाण केली होती. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून अद्याप ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
काम बंद आंदोलनामुळे शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, नोंदणी व इतर प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. नागरिकांना विविध कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत असून, दैनंदिन सेवा विस्कळीत झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या मते, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला होणे ही गंभीर बाब असून, अशा घटनांमुळे कामकाजावर विपरीत परिणाम होतो. प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांची भेट घेत निवेदन सादर करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

