Forget the gap… Devpur villagers showed the ideal path : देवपूर येथील ग्रामस्थांनी एकात्मतेचा संदेश देत अज्ञात व्यक्तीने २५ फेब्रुवारीच्या रात्री बसविलेला शिवरायांचा पुतळा स्वीकारून तो हटवू नये, अशी विनंती प्रशासनाकडे केली आहे.

अज्ञातांनी बसविलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला दिले संरक्षण : न हटविण्याची प्रशासनाकडे विनंती
बुलढाणा : अलीकडेच चिखला येथील घटनेने राज्यभरात वादंग उभे राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून हा वाद उद्भवला होता. अजूनही हे प्रकरण शांत झाले नाही. मात्र, देवपूर येथील ग्रामस्थांनी एकात्मतेचा संदेश देत अज्ञात व्यक्तीने २५ फेब्रुवारीच्या रात्री बसविलेला शिवरायांचा पुतळा स्वीकारून तो हटवू नये, अशी विनंती प्रशासनाकडे केली आहे. महाराष्ट्रात तेढ निर्माण झालेले असताना देवपूरवासीयांनी एकतेचा आदर्श मार्ग दाखविला आहे.
बुलढाणा तालुक्यातील देवपूर हे छोटेशे गाव आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणास्थान ठरले आहे. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने गावात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला. राज्यभर अशाच प्रकारच्या अनेक घटनांमुळे सामाजिक तणाव, वाद आणि काही ठिकाणी हिंसक झगडे होत असताना, देवपूरच्या ग्रामस्थांनी मात्र पूर्णपणे वेगळे आणि सकारात्मक उदाहरण घालून दिले आहे.
गावकऱ्यांची एकजूट आणि शिवभक्तीची भावना
पुतळा बसवल्याची बातमी समजताच गावातील सर्व स्तरातील लोक एकत्र आले. त्यांनी या पुतळ्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. हटविण्याची कारवाई होऊ नये, उलट तो कायम राहावा, यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन शासनाकडे औपचारिक विनंती केली आहे. गावकरी म्हणतात, ‘हा पुतळा आमच्या गावाचा अभिमान आहे. अज्ञात भक्ताने केलेली ही शिवभक्ती आम्ही सर्वजण मानतो. येथे कोणताही वाद नको, फक्त एकता आणि आदर हवा आहे.
राज्यातील पार्श्वभूमी
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या उभारणीसंदर्भात अनेक ठिकाणी वाद निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी परवानगीशिवाय बसविलेल्या पुतळ्यांमुळे प्रशासनाने हटविण्याची कारवाई केली, तर काही ठिकाणी दोन गटांमध्ये संघर्ष झाले. अशा पार्श्वभूमीवर देवपूर गावाने दाखवून दिले आहे की, शिवरायांच्या नावावर एकत्र येणारे आमचे गाव आहे. पुतळ्याची विटंबना करणारे नाही.
देवपूरच्या या घटनेतून स्पष्ट होते की, खरी शिवभक्ती म्हणजे केवळ पुतळा उभारणे नव्हे, तर त्याला सर्वांच्या मनात स्थान देणे आणि समाजाला एकसंध ठेवणे होय. गावकऱ्यांनी प्रशासनाला साद घातली की, पुतळ्याला अधिक भव्य स्वरूप देऊन कायमस्वरूपी जागा निश्चित करावी.


