Mahavitarans meter removal campaign : महावितरणने वरवट बकाल (ता. संग्रामपूर) वितरण केंद्राअंतर्गत वीज बिल वसुलीसाठी सामूहिक कारवाई करत थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडितच केला नाही, तर चक्क वीज मीटर काढून नेले.

वरवट बकाल वितरण केंद्राअंतर्गत महावितरणची सामूहिक कारवाई
बुलढाणा : महावितरणने वरवट बकाल (ता. संग्रामपूर) वितरण केंद्राअंतर्गत वीज बिल वसुलीसाठी सामूहिक कारवाई करत थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडितच केला नाही, तर चक्क वीज मीटर काढून नेले. वीज बिल भरणार नाही तर वीजही मिळणार नाही, अशी नाइलाजास्तव भूमिका महावितरणला घ्यावी लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी केले आहे.
महावितरणच्या संग्रामपूर उपविभागातील वरवट बकाल वितरण केंद्राअंतर्गत घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वर्गवारितील ३ हजार ८९९ वीज ग्राहकाकडे १ कोटी ८१ लाख रुपयांचे वीज बिल थकत आहे. महावितरणकडून वारंवार आवाहन करूनही वीज बिल भरण्याला प्रतिसाद न देणाऱ्या भागात सामूहिक कारवाई करण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिले आहे.
महावितरणने सुरू केलेल्या कारवाई दरम्यान ७३ वीज ग्राहकांनी ६ लाख २१ हजार रुपयांचा भरणा करून महावितरणच्या कारवाईपासून सुटका केली आहे, तर १८ वीज ग्राहकांचे मीटर काढून आणले आहे. परंतु दरम्यान १८ पैकी १३ वीज ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा केल्यानंतर, त्या ग्राहकांचे काढलेल्या मीटरच्या जागी नवीन स्मार्ट मीटर बसवून त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
… तर गुन्हा दाखल होणार
महाविरणची सामूहिक वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई ही यापुढे सतत सुरू राहणार आहे. वीज मीटर काढून आणलेल्या वीज ग्राहकांनी बाजूच्या घरातून अनधिकृत वीजपुरवठा घेतला असल्याचे निदर्शनास आल्यास अनधिकृत वीजपुरवठा घेणाऱ्या आणि देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.

