उकीरड्यांच्या आगीने मुंबई – नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प : Traffic on Mumbai-Nagpur highway disrupted

शर्थीच्या प्रयत्नानंतर पिंपरी सरहद्द येथील आग आटोक्यात
मेहकर : तालुक्यातील डोणगावपासून जवळच असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पिंपरी सरहद येथे गावाशेजारी मुंबई ते नागपूर राज्य महामार्गा (महादेशा ब्रेकिंग ) लगत असलेल्या उकिरड्यांना २९ मार्चच्या संध्याकाळी सात वाजतादरम्यान आग लागली. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे सुमारे एक तास वाहतूक बंद होती. समोरील काही दिसत नसल्याने दोन ते तीन किरकोळ अपघातसुद्धा घडले. गावकऱ्यांसह मेहकर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले.

वाशीम जिल्ह्याचे शेवटचे गाव असलेल्या पिंपरी सरहद्द या गावाची सीमा बुलढाणा जिल्ह्याला लागून आहे. डोणगावपासून तीन किलोमीटर अंतरावर ही गाव येते. या गावातून मुंबई ते नागपूर राज्य महामार्ग गेला आहे. महामार्गाशेजारी मोठ्या प्रमाणात उकिरडे आहेत. त्यावर कचरा, शेण मोठ्या प्रमाणावर असल्याने २९ मार्चच्या संध्याकाळी या उकिरड्यांना आग लागली. या आगीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने महामार्गावर धूर पसरला होता. समोरील वाहने दिसत नव्हती. दोन ते तीन किरकोळ अपघात घडले. अपघात घडू नये म्हणून गावकऱ्यांनी समय सूचकता दाखवत वाहतूक बंद केली. साडेसात ते साडेआठ वाजेदरम्यान ही वाहतूक बंद होती. यावेळी गावकऱ्यांनी मेहकर अग्निशमन दलाला पाचारण केले. गावकरी व अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात आली. ही आग पसरली असती तर वस्तीला धोका निर्माण झाला असता.


