Union Minister Prataprao Jadhav inquires about the Ghazipur accident victims at the Buldhana District Hospital. : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून बुलढाणा जिल्हा रुग्णालयातील गाझीपूर अपघातग्रस्तांची विचारपूस

बुलढाणा: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाला आकस्मिक भेट देऊन, उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे झालेल्या भीषण अपघातातील जखमींवर सुरू असलेल्या उपचारांची पाहणी केली. या दुःखद घटनेतील पीडितांना भेटून त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना मिळत असलेल्या वैद्यकीय सुविधांबद्दल माहिती घेतली.
९ एप्रिल रोजी मोताळा तालुक्यातील भाविकांना घेऊन देवदर्शनासाठी निघालेल्या वाहनाला उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील नंदगंज येथे अपघात झाला होता. या हृदयद्रावक घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला, तर ३८ प्रवासी जखमी झाले. गाझीपूर येथे प्राथमिक उपचारानंतर काही रुग्णांना घरी सोडण्यात आले, तर काही गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज, २० एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर असताना, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी गाझीपूर अपघातात जखमी झालेल्या निर्मलाबाई पाखरे आणि भागीरथी चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. रुग्णालयात मिळत असलेल्या वैद्यकीय सुविधा आणि उपचारांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, त्यांनी वॉर्ड क्रमांक २ मधील इतर रुग्णांशीही संवाद साधून त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक दत्तात्रय बिराजदार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी उपस्थित होते.

या भेटीनंतर, केंद्रीय मंत्री जाधव यांनी रोहिणखेड येथे जाऊन अपघातात दुर्दैवी निधन झालेल्या सरस्वताबाई पाखरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. याच गावातील जखमी भानुदास हुंबड आणि नलिनी हुंबड यांच्या घरीही त्यांनी भेट देऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. या प्रसंगी आमदार संजय गायकवाड यांचे चिरंजीव पृथ्वीराज गायकवाड, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, तालुकाप्रमुख रामदास चौथनकर, गणेशसिंग राजपूत, निलेश राठोड यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/
केंद्रीय मंत्र्यांच्या या भेटीमुळे अपघातग्रस्तांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रशासनाकडून त्यांना योग्य ती मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


