child marriage abolition : बालविवाहमुक्त भारत अभियान मुक्तीरथाला मंगळवार, २७ जानेवारीला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी
बुलढाणा : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि अस्मिता फाउंडेशनच्या वतीने बालविवाहमुक्त भारत अभियान मुक्तीरथाला मंगळवार, २७ जानेवारीला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले.
बालविवाहमुक्त भारत अभियान हे भारत सरकार व विविध राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नातून राबवले जाणारे राष्ट्रीय पातळीवरील जनजागृती व कृती अभियान आहे.
१८ वर्षांखालील मुलींचे व २१ वर्षांखालील मुलांचे विवाह पूर्णतः थांबवणे हा या अभियानाचा मूळ उद्देश आहे.
अभियानाच्या माध्यमातून बाल विवाहाची सामाजिक रूढी संपवणे, मुलींचे शिक्षण टिकवून ठेवणे, बालकांचे आरोग्य व सुरक्षित भविष्य सुनिश्चित करणे, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि समाजात जनजागृती वाढवणे हे प्रमुख उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, उपजिल्हाधिकारी महसूल समाधान गायकवाड, अनिल गोडगे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वाक्षरी मोहीम
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि वरिष्ठ अधिकारी यांनी स्वाक्षरी करुन बाल विवाह मुक्त भारत अभियानांतर्गत स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवला.


