
बुलढाणा : देशाचे भवितव्य असलेले विद्यार्थी दिल्लीतील जंतर-मंतरवर लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांसाठी आंदोलन करत होते. नीट पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार असलेल्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे .परंतु या हुकूमशाही सरकारने विद्यार्थ्यांचे ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला. शिक्षणाचा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करणाऱ्या या सरकारच्या काळात इंग्रजांच्या राजवटीची आठवण येत आहे, जनताच आता मोदी – शहाची हुकुमशाही सत्ता उलथून टाकेल, असा घणाघात प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव तथा प्रवक्ता विश्वदीप पडोळ यांनी केला.
विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्ज आणि अत्याचाराच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या वतीने २२ जुलै रोजी जयस्तंभ चौकात तीव्र निदर्शने करत अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न होऊन केंद्र सरकारच्या दडपशाहीचा आणि पोलिसांच्या कारवाईचा जोरदार निषेध नोंदवला. यावेळी आंदोलकांनी ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे सरकार हाय हाय’ , पेपर लीक से आजादी, लोकशाही मागे आजादी, स्टुडंट मागे आजादी, हमे चाहिये आजादी, पोलीस मागे आजादी आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या जोरदार घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. व काही काळानंतर सोडून दिले. दरम्यान पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगली झटापट पाहायला मिळाली.केंद्र सरकारने तात्काळ विद्यार्थी मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव तथा प्रवक्ता विश्वदीप पडोळ, प्रदेश युवक सचिव शिवराज पाटील, शहराध्यक्ष दत्ता काकस, शैलेश खेडकर,सुनिल तायडे, विजय सपकाळ, तुषार खरे, ज्ञानेश्वर पचांगे, संदिप पैठणे, ओमसिंग राजपूत, अतुल सिरसाठ, शाम सावंत,शेख ईरफान, प्रविण पाटील, भरत पाटील, भगवान गायकवाड, पंडितराव निकाळजे, अमोल मोरे, भाई संदिप बोर्डे, अविनाश खरात, जितेंद्र बोर्ड, निलेश गवळी, नितीन गायकवाड, गोपाल गिते यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे सांडलेले रक्त सरकारचा हिशोब घेईल : शिवराज पाटील
संविधानिक पद्धीतने आंदोलन करत असताना अमानुषपणे विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. या आंदोलनातून हजारो विद्यार्थ्यांचे रक्त सांडले आहे. तर नीट पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकाराने आत्महत्याग्रस्त कुटुंबियाचे आश्रु पुसायचे तर पुन्हा विद्यार्थ्यांचे रक्त सांडले. विद्यार्थ्यांचे सांडलेले रक्त सरकारचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही, असे प्रदेश सचिव शिवराज पाटील म्हणाले.


