Raipur villagers march for water : रायपूर येथे धरण उशाशीच आहे, त्यातच तीन-तीन पाणीपुरवठा योजनांवर सुमारे दहा कोटींचा खर्चही झाला. परंतु दोन-दोन महिने गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. बाराही महिने पाणीटंचाई राहात असल्याने संतप्त महिलांसह ग्रामस्थांनी बुधवार, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला.

दहा कोटी खर्चूनही टंचाई : धरण उशाला असूनही गावकरी तहानलेले
बुलढाणा : तालुक्यातील रायपूर येथे धरण उशाशीच आहे, त्यातच तीन-तीन पाणीपुरवठा योजनांवर सुमारे दहा कोटींचा खर्चही झाला. परंतु दोन-दोन महिने गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. बाराही महिने पाणीटंचाई राहात असल्याने संतप्त महिलांसह ग्रामस्थांनी बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला.
रायपूर येथे जवळच असलेल्या पळसखेड भट येथील तलावावरून पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु सर्वच योजना कुचकामी ठरल्याने ग्रामस्थांची विशेषत: महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी बारोमास फरफट होत आहे. महाजल योजनेवर ३ कोटी ८७ लाख, जलजीवन मिशन योजनेवर ४ कोटी २५ लाख, ग्रामपंचायतीमार्फत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून दोन कोटी रुपये पाण्यावर खर्च करण्यात आले. परंतु एकही योजना धड सुरू नाही. दोन-दोन महिने पाणी मिळत नसल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या निधीचा योग्य वापर झाला आहे काय, याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जिल्हा परिषद व पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. अमोल पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मोर्चात नलूबाई पाटील, दीपाली सोनुने, विद्या सिरसाट, इंदुबाई सोनुने, मंगला सिरसाट, पार्वती सिरसाट, नंदा सिरसाट, कावेरी पाटील, शाहेरीनबी शेख राजू, शारदा करडेल, गीता सास्ते, अमीनाबी शेख मसूद, यमुनाबाई पाटील, डी.ए. पाटील, अनिता भोसले, माया राजपूत, सखुबाई म्हस्के यांच्यासह असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.

