All-round progress of Buldhana district: Guardian Minister Makarand Patil’s statement on the 80th Independence Day. : बुलढाणा जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती: ८० व्या स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री मकरंद पाटील यांचे प्रतिपादन

बुलढाणा, दि. १५ ऑगस्ट: भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मकरंद पाटील यांनी जिल्ह्याच्या कृषी, उद्योग, आरोग्य आणि विकासाच्या विविध क्षेत्रांतील दमदार वाटचालीचे विस्तृत प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला, तसेच शेतकऱ्यांना मदतीचा आधार आणि युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रशासनाच्या कटिबद्धतेवर प्रकाश टाकला.

या सोहळ्याला आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरा, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, वीर माता, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकासाची नवी दिशा: कृषी ते तंत्रज्ञान
पालकमंत्री पाटील यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, स्वातंत्र्यानंतर भारताने कृषी, उद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या अनेक क्षेत्रांत लक्षणीय प्रगती केली आहे. आजचे युवक हे डिजिटल भारताची खरी शक्ती असून, त्यांची नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता, समस्या सोडवण्यासाठी नावीन्यपूर्ण मार्ग शोधण्याची जिद्द आणि देशासाठी योगदान देण्याची तीव्र इच्छा हीच त्यांची खरी ताकद आहे. युवकांच्या कल्पना, नवोन्मेष आणि ऊर्जेतूनच विकसित महाराष्ट्राची निर्मिती शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरी
बुलढाणा जिल्ह्याने कृषी क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. यावर्षी आतापर्यंत ४०५.५० मिमी म्हणजेच ५३.२४ टक्के पाऊस झाला असून, खरीप हंगामात ७ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर, म्हणजेच ९६.४५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत:
• प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना: ११ हजार ६२ लाभार्थ्यांना ३६ कोटी ८२ लाख रुपये.
• मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना: १० हजार ८६४ लाभार्थ्यांना १७ कोटी ७९ लाख ३६ हजार रुपये.
• अटल भूजल योजना: ३६२ लाभार्थ्यांना ७८ लाख ५० हजार रुपये.
• गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना: २०२५-२६ मध्ये १३३ प्रकरणांसाठी २ कोटी ६२ लाख रुपयांचे अनुदान वितरित.
याव्यतिरिक्त, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ संकल्पनेतून ९७५ प्रस्तावांसाठी ३२ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान देऊन ग्रामीण भागातील उद्योग आणि रोजगाराला चालना देण्यात आली आहे.

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना विक्रमी मदत आणि पीक विमा
मदत व पुनर्वसन विभागाने जानेवारी २०२५ ते जून २०२६ या १८ महिन्यांच्या कालावधीत राज्यातील १ कोटी ५४ लाखांहून अधिक आपत्तीग्रस्त लाभार्थ्यांच्या खात्यात २१ हजार ५४३ कोटी रुपयांची विक्रमी मदत थेट जमा केली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख ७७ हजार बाधित शेतकऱ्यांना शेतीपिके व जमीन नुकसानीपोटी ४५५ कोटी ९८ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असून, खरीप २०२४-२५ मध्ये ५ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना ७१४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई वितरित करण्यात आली आहे. खरीप २०२६-२७ साठी आतापर्यंत २ लाख ५५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे.
कर्जमुक्ती आणि रोजगार निर्मिती
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे २ लाख २७ हजार ६४६ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. रोजगार निर्मितीमध्येही जिल्ह्याने दमदार कामगिरी केली आहे. २०२५-२६ मध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याने १०० टक्के लक्ष्य पूर्ण करून १ हजार १२० रोजगारांची निर्मिती केली आहे.
पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक न्याय
राज्यात २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, बुलढाणा जिल्ह्यासाठी दरवर्षी १० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या मोहिमेतून ग्रामस्तरावर आरोग्य सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वसतिगृहे आणि निवासी शाळांच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

समाधान शिबिरे आणि कौशल्य विकास
बुलढाणा जिल्ह्यात २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरां’ना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरांमधून ३३ हजार ६७४ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ आणि साहित्याचे वितरण करण्यात आले. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत २२ हजार ३६४ उमेदवारांनी नोंदणी केली असून, ५ हजार ३०७ तरुणांनी रोजगाराचे स्वप्न साकार केले आहे.
क्रीडा आणि पर्यटन क्षेत्राला नवी दिशा
जिल्ह्यात सुमारे ४४ हजार खेळाडू विविध क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी होत असून, ९६ क्रीडा प्रकारांच्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील १२ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवून जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. लोणार सरोवर, संत गजानन महाराजांची भूमी शेगाव आणि राजमाता जिजाऊ साहेबांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा यांसारखी ऐतिहासिक व धार्मिक स्थळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी उभारी देत आहेत. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये सहभागाचे आवाहन
मृद व जलसंधारण विभागामार्फत २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’सह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री नामदार मकरंद पाटील यांनी केले.
या समारंभात पोलीस प्रशासनातील उल्लेखनीय कार्य करणारे अधिकारी-कर्मचारी, जिल्हा परिषदेअंतर्गत उत्कृष्ट ग्रामपंचायती आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पालकमंत्री नामदार मकरंद पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी तंबाखूमुक्तीची शपथही घेण्यात आली. कृषी, क्रीडा, सामाजिक न्याय, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, पर्यटन, उद्योग, शिक्षण आणि आरोग्य अशा प्रत्येक क्षेत्रात बुलढाणा जिल्हा विकासाची नवी वाट निर्माण करीत असून, स्वातंत्र्य दिनाच्या या पवित्र प्रसंगी विकसित, समृद्ध, आत्मनिर्भर आणि सक्षम भारत घडविण्याचा निर्धार करूया, असे आवाहन त्यांनी केले.

