Enthusiasm for ‘Jal Utsav’ in Buldhana District; ‘Jal Arpan’ Ceremony Held at Sakhali Khurd and Gargundi. : बुलढाणा जिल्ह्यात ‘जल उत्सव’चा उत्साह; साखळी खुर्द व गारगुंडी येथे ‘जल अर्पण’ सोहळा.

बुलढाणा, दि. १६ – जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांचे व्यवस्थापन ग्रामस्थांच्या हाती सोपवण्यासाठी जिल्ह्यात ‘जल उत्सव’ मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. या उत्सवाचा भाग म्हणून बुलढाणा तालुक्यातील साखळी खुर्द येथे १७ मार्च तर देऊळगाव राजा तालुक्यातील गारगुंडी येथे १८ मार्च रोजी ‘जल अर्पण दिवस’ उत्साहात साजरा होणार आहे. ग्रामस्थांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपल्या गावाच्या पाणीपुरवठा प्रणालीचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी केले आहे.
देशभरात ८ ते २२ मार्च या कालावधीत जल उत्सव साजरा होत असून, बुलढाणा जिल्ह्यातही ‘हर घर जल’ घोषित झालेल्या गावांमध्ये या योजनांचे हस्तांतरण, देखभाल व व्यवस्थापन ग्रामपंचायती, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती आणि समुदायाकडे सोपवण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी तांत्रिक पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली असून, नळ पाणीपुरवठा योजनेची १५ ते ३० दिवसांची चाचणी, पाण्याची गुणवत्ता तपासणी (फिल्ड टेस्ट किटद्वारे), दस्तऐवजीकरण, पाणीपुरवठा समितीचे बँक खाते कार्यान्वित करणे, ऑपरेटर व नल जल मित्रांचे प्रशिक्षण आणि स्त्रोत शाश्वतता आराखडा तयार करणे यासारख्या उपाययोजना राबविल्या जात आहेत.
साखळी खुर्द व गारगुंडी येथील कार्यक्रमात जल पूजन, नळ पूजन, जल प्रतिज्ञा, शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ग्रामसभा, पीआरए (Participatory Rural Appraisal) आयोजन, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक व युवकांचा सहभाग असे विविध जनजागृती उपक्रम राबविले जाणार आहेत.
साखळी खुर्दचे सरपंच पंडित बळीराम हिवाळे, ग्रामपंचायत अधिकारी ज्योती मगर, गारगुंडीचे सरपंच गजानन काकड व ग्रामपंचायत अधिकारी नितीन अंभोरे यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक सतीश देशमुख, कार्यकारी अभियंता अनिल चव्हाण, संबंधित तालुक्यांचे गटविकास अधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे अभियंते यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या उत्सवामुळे ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी जनतेकडे येऊन शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी पुन्हा केले आहे.


