Mahanubhav Sect Satsang Begins in the Presence of Three Thousand Mahants. : तीन हजार महंतांच्या उपस्थितीत महानुभाव पंथीय सत्संगाला प्रारंभ

बुलढाणा
तालुक्यातील रुईखेड टेकाळे येथील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या महानुभाव पंथीय सत्संगात तब्बल तीन हजार संत, महंतांनी हजेरी लावली आहे. प.पू.प.म. आचर्यप्रवर श्रीमोठेबाबा अंकुळनेरकर (जाधववाडी, पुणे) यांच्या वाणीतून या सत्संगाला प्रारंभ झाला आहे. तीस एकर परिसरात भव्य शामियाना उभारण्यात आला असून, संत, महंतांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्रवचन ऐकण्यासाठी जिल्हाभरातील महानुभाव पंथीय नागरिकांनी गर्दी केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यामध्ये महानुभाव पंथाचा मोठा प्रभाव आहे. या पंथाशी अनेक भाविक जुळलेले आहेत. अनेक साधक अशा कार्यक्रमांच्या ठिकाणी सेवा देतात. यावर्षी बुलढाणा जिल्ह्यात पहिल्यांदाच जाधववाडी महानुभाव पंथीय सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे. १३ ते ३० एप्रिलदरम्यान हा सत्संग पार पडणार आहे. दररोज गीता वाचन, देवपूजा, प्रवचन असे विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. १५ एप्रिल रोजी प.पू.प.म. आचर्यप्रवर श्रीमोठेबाबा अंकुळनेरकर यांचे आगमन झाले. त्यांनी सर्व धार्मिक सोपस्कार पूर्ण केल्यानंतर सत्संगाला सुरुवात झाली.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/
तीन हजार महिला व पुरुष संत, महंत, भिक्षुकांच्या राहण्याची, भोजनाची चोख व्यवस्था गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. त्यासाठी वेगवेगळे मंडप उभारण्यात आले आहेत. तसेच कार्यक्रमासाठी भव्यदिव्य शामियाना उभारलेला आहे. या ठिकाणी आजपासून प्रवचनाला सुरुवात झाली आहे. बुलढाणा जिल्हाच नव्हेतर राज्यभरातून भाविकदेखील हजारोंच्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
शेकडो बसेसद्वारे आगमन
पुणे, छत्रपती संभाजीनगर, मोर्शी, अमरावती यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून एसटी महामंडळाच्या शेकडो बसेसच्या माध्यमातून संत, महंत रुईखेड टेकाळे येथे दाखल झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात बसेस येत असल्याने रुईखेड टेकाळे येथील मार्गावर मोठी वर्दळ दिसून येत आहे.
येळगाव ते सव रॅलीद्वारे स्वागत
आचर्यप्रवर श्रीमोठेबाबा अंकुळनेरकर यांचे येळगाव फाट्यावर आगमन झाले. येळगाव येथून सव, रुईखेड टेकाळेपर्यंत मोटारसायकल रॅली काढून महाराजांचे जंगी स्वागत करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान जागोजागी स्वागत झाले. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले.
ग्रामस्थांचे एकदिलाचे कार्य
या सत्संग सोहळ्याच्या नियोजनासाठी गावकऱ्यांनी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी चालविली आहे. आपापल्या परीने जी मदत होईल, ती करण्यात आली. प्रत्येकाने श्रमदान सुरू केले आहे. अन्नधान्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येकजण जबाबदारीने आपली भक्ती प्रकट करताना दिसत आहे.


