Three and a half lakh maize burnt : लोंबकळलेल्या विद्युततारांमध्ये घर्षण होऊन ठिणगी पडल्याने लागलेल्या आगीत साडेचार एकरातील साडेतीन लाख रुपये किमतीचा मका जळून खाक झाला.
महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान : शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला


गजानन राऊत
मेहकर : तालुक्यातील पांगरखेड येथे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. (महादेशा न्यूज ) लोंबकळलेल्या विद्युततारांमध्ये घर्षण होऊन ठिणगी पडल्याने लागलेल्या आगीत साडेचार एकरातील साडेतीन लाख रुपये किमतीचा मका पूर्णपणे जळून खाक झाला. १५ एप्रिलच्या सकाळी साडेसात वाजेदरम्यान ही घटना घडली.
या घटनेने शालूबाई कडुजी वाकुडे या विधवा शेतकरी महिलेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पांगरखेड शिवारामध्ये शेत सर्वे नंबर १८ मध्ये त्यांनी साडेचार एकरामध्ये मका पिकाची लागवड केली होती. कापणी करून मक्याच्या कणसांची गंजी मारून ठेवली होती. या सुडीवरूनच महावितरणची वीजवाहिनी गेली आहे. या तारा लोंबकलेल्या होत्या. (महादेशा न्यूज ) १५ एप्रिलच्या सकाळी साडेसात वाजता तारांचे घर्षण होऊन गंजीवर ठिणग्या पडून आग लागली. आगीत मक्याची संपूर्ण सुडी जळून खाक झाली. हाता-तोंडाशी आलेले पीक या घटनेमुळे नष्ट झाले.
या घटनेमुळे शेतकरी महिला मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी बालाजी तिडके (महादेशा न्यूज ), महसूलसेवक भगवान बघे यांनी पंचनामा केला. आगग्रस्त शालूबाई वाकुडे यांना नुकसानभरपाई देण्यात यावी; अन्यथा महावितरण कंपनीवविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


