Fifteen-year-old girl stops her own child marriage! : दहावीत शिक्षण घेणाऱ्या पंधरा वर्षीय मुलीने मोठे धाडस दाखवून थेट राज्य महिला आयोग आणि पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून मदत मागितली. लग्नाच्या आदल्या दिवशीच्या रात्रीच यंत्रणा कामाला लागली आणि जबरदस्तीचा नियोजित बालविवाह रोखण्यात यश आले.
शरद माळोदे

थेट महिला आयोगासह पोलीस अधीक्षकांना मागितली मदत
बुलढाणा : दहावीत शिक्षण घेणाऱ्या पंधरा वर्षीय मुलीने मोठे धाडस दाखवून आई, वडिलांसह नातेवाइकांच्या चुकीच्या निर्णयाचा प्रचंड विरोध केला. बालविवाहासाठी जबरदस्ती करण्यात आल्याने मुलीने थेट राज्य महिला आयोग आणि पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून मदत मागितली. लग्नाच्या आदल्या दिवशीच्या रात्रीच यंत्रणा कामाला लागली आणि नियोजित बालविवाह रोखण्यात यश आले. देऊळगाव राजा तालुक्यातील किन्ही पवार येथे स्वतःचा बालविवाह रोखून ही धाडसी मुलगी सर्वच मुलींसमोर एक मिसाल बनली आहे.
मला शिक्षण घ्यायचे आहे, नोकरी करायची आहे, माझा जबरदस्तीने बालविवाह लावला जात आहे, मला मदत हवी आहे, अशी याचना मुलीने पत्रात केली होती. तिची शिक्षणासाठीची तळमळ यातून दिसून आली.
३२ वर्षीय नवरदेवासोबत या मुलीचा बालविवाह ३ मे रोजी लावला जाणार होता. लग्नाच्या आदल्या दिवशीच्या रात्रीच प्रशासकीय यंत्रणेसह पोलीस प्रशासनाने मुलीसाठी तत्परता दाखवत कारवाई करून नियोजित बालविवाह थांबविला.
ही महत्त्वाची बातमी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👉
खैरव येथे मुख्यमंत्र्यांचे पीए विद्याधर महाले यांच्याहस्ते मैत्रेय बुद्धविहाराचे लोकार्पण
महिला बाल विकास विभाग आणि जिल्हा पोलीस दलाने ही संयुक्त कार्यवाही केली. राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांच्या आदेशाने वरिष्ठ समुपदेशक व प्रकल्प अधिकारी सानिका शरीफ यांनी बुलढाण्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल दिघुळे यांना हा बालविवाह रोखण्यासंदर्भात माहिती दिली. देऊळगाव राजा तालुक्यातील किन्ही पवार या गावात १४ एप्रिल रोजी मुलीचा साखरपुडा करण्यात आला होता. मुलगी दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. तिच्यावर हे लग्न करण्याचा मोठा दबाव होता. मुलीने या लग्नाला प्रखर विरोध केला. मात्र, तिची सर्वांशी लढण्याची एकटीची ताकद कमी पडत होती. घरचे लोक ऐकायला तयार होत नव्हते. अखेर शिक्षणच तिची शक्ती बनले. बाल अधिकार आणि बालविवाहाबाबत माहिती असल्याने मुलीने जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या नावे पत्र लिहून मला शिक्षण घ्यायचे आहे, नोकरी करायची आहे, याकरिता माझे लग्न थांबवा, अशी विनंती केली. त्याचप्रमाणे महिला आयोगालाही विनंती करीत मदत मागितली. हे पत्र महिला व बालविकास सचिवालयास मिळाले आणि जलदगतीने पीडित मुलीस मदत मिळाली.
पोलीस आणि प्रशासनाची तत्परता
मुंबईच्या राज्य महिला आयोगामार्फत मदत देण्यासाठी बुलढाणा येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दिघुळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे व चाइल्डलाइन प्रकल्प समन्वयक शेख सोहेप तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात देऊळगाव राजा पोलीस स्टेशन निरीक्षक ब्रह्म गिरी हे बाल कल्याण विभाग, पोलीस अधिकारी व महिला पोलिसांना घेऊन किन्ही पवार येथे २ मी रोजी रात्री पोहोचले. मुलीसोबत पालकांचे समुपदेशन करीत विवाह थांबविण्यात आला.
पोलीस संरक्षणात निरीक्षण गृहात दाखल
हा विवाह लावण्यापूर्वीच मुलीस काळजी आणि संरक्षणासाठी बालकल्याण समिती अध्यक्ष मनोज डांगे यांच्या आदेशाने बालिकेला सुरक्षित निवासाकरिता बुलढाणा येथील शासकीय मुलींचे निरीक्षण गृह बालगृह येथे मध्यरात्री पोलीस संरक्षणामध्ये दाखल करण्यात आले. बालिकेच्या स्वजागृतीमुळे व बाल अधिकाराची जाणीव असल्यामुळे तिने स्वतःचा बालविवाह थांबविला.


