A Modern-Day Hirkani from Buldhana : बुलढाण्यातील आधुनिक हिरकणी: भावी पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा

बुलढाणा प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरेल.” या विचारातूनच त्यांनी संविधानात शिक्षणाचा अधिकार समाविष्ट केला, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाची संधी मिळाली. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे, पेपरफुटीच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे २०-३० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, परंतु या देशात कोणीही त्याची जबाबदारी घेतली नाही.
या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी CJP (Campaign for Justice and Peace) या संस्थेने देशव्यापी आंदोलन उभे केले. या आंदोलनाला विविध पुरस्कार विजेते सोनम वांगचूक यांनी पाठिंबा दिला आणि ढासळलेल्या व भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेविरोधात आमरण उपोषण सुरू केले. त्यांच्या या कृतीमुळे आंदोलन अधिक प्रभावी आणि व्यापक झाले. संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर उतरले, कारण हा युवकांच्या, म्हणजेच आपल्या येणाऱ्या पिढीच्या सुरक्षित भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे भारतभर जोरदार आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनात बुलढाणा जिल्ह्यातील ‘रमाईच्या लेकीं ग्रुप’, ‘क्रांती ज्योती स्वयं सहायता बचत गट’, ‘यशसिद्धी सैनिक सेवा महिला संघ’ आणि ‘वसुंधरा सेवा’ यांसारख्या शेकडो महिला संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला. २० जुलै २०२६ रोजी, सोमवारी सायंकाळी ४.०० वाजता, बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. तसेच, जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत माननीय राष्ट्रपती महोदयांना निवेदन देऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हिरकणी नावाच्या एका गवळीण महिलेने आपल्या बाळासाठी रायगडाची कडा उतरली होती, जी आजपर्यंत कोणीही सर केली नव्हती. केवळ आपल्या बाळासाठी तिने हे धाडस केले. याचा अर्थ असा की, आपल्या बाळासाठी एक अबला स्त्री देखील सक्षमपणे उभी राहू शकते. आजच्या या आंदोलनातून हेच दिसून आले. आजही येणाऱ्या पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी आधुनिक हिरकणी मैदानात उतरल्या आहेत.
पेपर लीक विरोधी आंदोलक सोनम वांगचूक, अभिजित दिपके, नेहा बोरा यांना पाठिंबा देण्यासाठी आणि ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्यांना व त्यांच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी ‘मातोश्री रमाईच्या लेकीं ग्रुप’च्या संयोजिका ज्योती अनिल डोंगरदिवे, मुख्य आयोजिका अस्मिता मनवर, सुषमा हिवाळे, मनीषा जाधव, प्रज्ञा भंडारे, साधना गवई, विद्या मिसाळ, सुनंदा खंडाळे, छाया सरकटे, आशा खिल्लारे, सुशीला गवई, सुनीता गवई, सुजाता हिवाळे, सुनीता जाधव, वैशाली सुखदाणे, सुशीला वानखडे, मनीषा बोर्डे, उषा लहाने, सुनीता गवई, आशा इंगळे, पूनम आराख, जया घेवंन्दे, वर्षा ताई, वैशाली धंदर, सुनीता गवई, नीता साळवे, सुकेशनी ठाकरे, वैशाली घेवंन्दे, सुनीता डोंगरदिवे, वर्षा कासरे, सीमा सरदार, वाघ ताई, साजेदा बेगम, निमा आफ्रिन, सिदा आफ्रिन, मनोज भालेराव, गौरव, प्रदीप मोरे, शीतल सोनुने (आयोजक), स्वाती काटकर, प्रतिभा भुतेकर, प्रज्ञा लांजेवार, मंजू जाधव, कस्तुरे ताई इत्यादी महिलांनी सक्रिय सहभाग घेऊन हे आंदोलन यशस्वी केले.
या आंदोलनातून बुलढाण्यातील महिलांनी आपल्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी दाखवलेली एकजूट आणि निर्धार निश्चितच प्रेरणादायी आहे. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात त्यांचा हा लढा भविष्यात सकारात्मक बदल घडवून आणेल अशी आशा आहे.


