Human lives were saved, but the donkeys were sacrificed. : माणसे वाचली गाढवांचा बळी गेला. डीपी रोडवरील चार विद्युत पोलमध्ये प्रवाह, मोठी दुर्घटना टळली

मेहकर | आसिफ शाह :
मेहकर नगरपालिकेचा कारभार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि व्हीआयपी रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डीपी रोडवरील स्ट्रीट लाईटच्या चार लोखंडी पोलमध्ये विद्युत प्रवाह आढळून आल्याने मोठी दुर्घटना टळली. या धोकादायक प्रकारात दोन गाढवांचा मृत्यू झाला असला तरी त्यांच्या बळीमुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ जूनच्या रात्री डीपी रोडवरील स्ट्रीट लाईटच्या काही लोखंडी पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. रात्रीच्या वेळी या प्रवाहाचा फटका दोन गाढवांना बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. २५ जून रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तातडीने संबंधित विभागाला माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे लाईनमन संतोष राणे तसेच महावितरणचे लाईनमन टेंभुर्णीकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. तपासणीदरम्यान तब्बल चार पोलमध्ये विद्युत प्रवाह असल्याचे आढळून आले. त्यानंतर तातडीने दुरुस्तीची कार्यवाही करण्यात आली.
डीपी रोड हा मेहकरमधील अत्यंत वर्दळीचा मार्ग असून येथे मोठी निवासी वस्ती, विविध शैक्षणिक क्लासेस तसेच सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने मॉर्निंग वॉकसाठी या रस्त्याचा वापर करतात. अशा परिस्थितीत एखाद्या नागरिकाने, विद्यार्थ्याने किंवा लहान मुलाने विद्युत प्रवाह असलेल्या पोलला स्पर्श केला असता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.
दोन मुक्या प्राण्यांचा दुर्दैवी बळी गेला असला तरी त्यांच्या मृत्यूमुळे प्रशासनाला जाग आली आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली, असे नागरिकांचे म्हणणे आहे
स्ट्रीट लाईट व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, मेहकर शहरात अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट दिवसा सुरू राहणे आणि काही भागांत रात्री बंद असणे, अशा तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. वीज आणि सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असतानाही संबंधित यंत्रणेकडून प्रभावी नियंत्रण दिसून येत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर तरी नगरपालिकेने शहरातील सर्व स्ट्रीट लाईट पोलची सुरक्षा तपासणी करून देखभाल व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.



