Union Minister of State Prataprao Jadhav visits farmers’ fields : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर: अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी, तातडीने पंचनाम्याचे निर्देश

बुलढाणा (प्रतिनिधी) : निसर्गाच्या अवकृपेने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ऐकल्या आणि प्रशासनाला तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
गेल्या ३० आणि ३१ जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला, ज्यामुळे अनेक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. विशेषतः संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील गावांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. ३१ जुलैच्या सकाळीच जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून, मंत्री महोदयांनी परिस्थितीची माहिती घेतली होती आणि प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

आज, १ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात दाखल होताच, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी कोणतीही दिरंगाई न करता जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील चावरा, इलोरा, मडाखेड खुर्द, मडाखेड बुद्रुक, काजेगाव, बोराळा बुद्रुक, बोराळा खुर्द, खेर्डा खुर्द, खेर्डा बुद्रुक, चांगेफळ, रुधाणा आणि वकाणा या गावांना भेट दिली. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीपिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार पवन पाटील, अजाबराव वाघ, कृषी अधिकारी रमेश वाघ, गटशिक्षणाधिकारी ऐश्वर्या कोरे हे अधिकारी उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्यादरम्यान, मंत्री महोदयांनी प्रशासनाला अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे तसेच घरांच्या पडझडीचे तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांशी संवाद साधताना, त्यांनी “आलेल्या संकटाला सामोरे जा, सरकार तुमच्या पाठीशी आहे,” अशी ग्वाही दिली, ज्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख शांताराम दाणे, जिल्हाप्रमुख संतोष डिवरे, उपजिल्हाप्रमुख देविदास घोपे, भाजपा नेते गजानन सरोदे, बंडू पाटील, युवासेना लोकसभा अध्यक्ष चेतन घिवे, तालुका प्रमुख केशव ढोकणे, कैलास कडाळे, राष्ट्रवादीचे चेतन देशमुख, रंगराव देशमुख, मोहन ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीमुळे शासनाची शेतकऱ्यांप्रति असलेली संवेदनशीलता अधोरेखित झाली असून, नुकसानग्रस्तांना लवकरच मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


