

रिसोड : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले विधान शिक्षणाचे सामर्थ्य अधोरेखित करते. याचा अर्थ शिक्षण माणसाला अन्याय, शोषणाविरुद्ध लढण्याची ताकद आणि आत्मसन्मान देते. शिक्षणाला वयाची मर्यादा नसते, हे सिद्ध करत रिसोड येथील ४७ वर्षीय मो. जमील नूर मोहंमद यांनी तब्बल ३१ वर्षांनंतर पुन्हा परीक्षा केंद्रावर जाऊन दहावीची परीक्षा दिली. मो. जमील नूर यांनी १९९५ साली दहावीची परिक्षा दिली होती. मात्र त्यावेळी नापास झाले होते. या कारणांमुळे शिक्षण मध्येच सोडावे लागले होते. मात्र शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा कायम मनात होती. अखेर त्यांनी धाडस करून पुन्हा अभ्यास सुरू केला आणि यावर्षी दहावीच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. ३१ वर्षांनंतर पुन्हा परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर त्यांच्यात उत्साह आणि आत्मविश्वास दिसून आला. आपल्या मुलांच्या वयाच्या विद्यार्थ्यांसोबत परीक्षा देत असताना जमील यांना मात्र कोणत्याही प्रकारचा संकोच किंवा अस्वस्थता वाटली नाही. परीक्षा केंद्रावर जाताना व परीक्षा देत असताना विद्यार्थी त्यांच्याकडे कुतूहलाने बघत असले तरी अनेक असंख्य विद्यार्थ्यांनी त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करत त्यांना परीक्षेबद्दल धीर दिला व त्यांना काही मार्गदर्शन सुद्धा केले, असे जमील यांनी सांगितले. त्यांच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले असून “शिकण्याला वय नसते” असा संदेश त्यांनी समाजाला दिला आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे अनेकांना प्रेरणा मिळत असून शिक्षण अपूर्ण राहिलेल्या व्यक्तींनीही पुढे येऊन आपले शिक्षण पूर्ण करावे, असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.


