Farmers should be granted an unconditional, blanket loan waiver. : शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी – संगीतराव भोंगळ

बुलढाणा, दि. १० जून : राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असली तरी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ चा लाभ घेतलेल्या लाखो शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ पाटील यांनी केला आहे. या शेतकऱ्यांनाही विनाअट सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २०१९ नंतर पुन्हा शेतीसाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सततची नापिकी, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, नैसर्गिक आपत्ती तसेच शेतमालाला न मिळालेला हमीभाव यामुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकरी प्रामाणिकपणे शेती करत असताना त्यांच्या डोक्यावर पुन्हा कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.
सध्या अनेक शेतकऱ्यांची थकबाकी एक ते दोन लाख रुपयांपर्यंत पोहोचली असून ती फेडण्याची त्यांची आर्थिक क्षमता उरलेली नाही. शासनाच्या विद्यमान निकषानुसार अशा शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे दोन लाख रुपयांची थकबाकी असलेल्या शेतकऱ्याला आधी दीड लाख रुपये भरावे लागतील आणि त्यानंतरच ५० हजार रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल. ही अट व्यवहार्य नसून त्यामुळे लाखो शेतकरी प्रत्यक्ष कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन महात्मा फुले कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत विनाअट संपूर्ण कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती लक्ष्मीताई शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई खेडेकर, चिखली तालुका अध्यक्ष दीपक म्हस्के, महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई इंगळे, पी. एम. जाधव, अनिल वर्मा, सुनील सोनूने, रिजवान भाई, राजेश गवई, भगवान शेळके, विष्णू पवार, शिवाजी पडोळ, मधुकर पाटील, प्रभाकर काळवघे, पंजाबराव राऊत, आशाताई पवार, ओम लेंडे, संजय शिरसाठ, विशाल पाटील, शेषराव पाटील, शिवराज शेळके, स्वराज शेळके, ज्ञानेश्वर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


