Corruption in Dusarbid Gram Panchayat : येथील ग्रामपंचायतीत विविध आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी २० एप्रिलपासून उपोषण करण्आंयाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
कारवाईसाठी २० एप्रिलपासून उपोषण
दुसरबीड : येथील ग्रामपंचायतीत विविध आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी २० एप्रिलपासून उपोषण करण्आंयाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. उपसरपंचासह ग्रा.पं. सदस्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ग्रामपंचायतीतील आवक-जावक नोंदींमध्ये पारदर्शकता नसून अनेक व्यवहारांची योग्य नोंद ठेवण्यात आली नाही. घरपट्टी व नळपट्टी वसुलीची रक्कमही ग्रामपंचायतीच्या खात्यात नियमितपणे जमा न करता मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सन २०२४-२५ व २०२५-२६ या कालावधीत आठवडी बाजार हक्कातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर व्यापाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याऐवजी इतरत्र वळविण्यात आल्याचेही समोर आले आहे. या रकमेबाबत खोटी बिले तयार करून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याशिवाय मागील दोन वर्षांतील विविध विकासकामांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.पाणीपुरवठा योजनेतही गंभीर अनियमितता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नवीन कनेक्शनच्या नावाखाली १-२ हजार रुपये निधी वसूल करूनही अनेक भागात गेल्या दोन वर्षांपासून नियमित पाणीपुरवठा झालेला नाही. काही ठिकाणी वॉर्ड क्रमांक १ व २ मध्ये पाणीपुरवठा ठप्प असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वसूल केलेल्या रकमेचा हिशोब न देता निधीचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून विशिष्ट कंत्राटदारांना कामे देत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. माहिती अधिकारातून माहिती मागवूनही ती देण्यात आली नसल्याने प्रशासनाविषयी नाराजी वाढली आहे. तसेच गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात आल्याचा मुद्दाही पुढे आला आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या उपसरपंच अशोक गुंजाळ, ग्रा.पं. सदस्य शेख अब्रार, आलियाअंजुम शेख तौफीक, आम्रपाली काळे, साधना जगताप, रामा सोनकांबळे, गजानन जगताप, गजानन काळे, तौफिक शेख यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
२० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि ग्रामपंचायतीतील कारभारात पारदर्शकता आणावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.


